नंदुरबार : सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून अनेक ठिकाणी वीज वाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा टाकणे व जाळण्याच्या प्रकारांमुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीजवितरण कंपनीलाही नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या तप्त वातावरणात वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि जाळूही नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
![download 4 1](https://mdtvnews.in/wp-content/uploads/2023/04/download-4-1.jpg)
याबाबत महावितरने नागरिकांना आवाहन केले असे आहे. शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा विद्युत खांब अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटवल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीज यंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधित परिसरातील वीज पुरवठाही खंडित होतो.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने कचऱ्यास आगी लागण्याचे प्रकार वाढत आहेत. उन्हामुळे तापलेल्या वीज यंत्रणेला असल्याने अशा आगीमुळे फटका बसतो. वीज वाहिनीखाली असलेल्या कचऱ्याचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास 1912 किंवा 1800-212-3435 आणि 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयाला त्याची माहिती देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार